१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Wednesday, April 17, 2019

गुफ्तगू


मार्च २०१९मध्ये 'राज्यसभा टीव्ही'वरील गुफ्तगू या कार्यक्रमात प्रदर्शित झालेली शहाण्यांची मुलाखत. 

Thursday, May 31, 2012

नवी नोंद

शंकर या बंगाली लेखकाच्या 'सीमाबद्ध' या कादंबरीचा 'मर्यादित' हा शहाण्यांनी केलेला अनुवाद. या अनुवादित पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि तिच्यासंबंधी शहाण्यांनीच सांगितलेली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी मिळून एक नवी नोंद ब्लॉगवर करतोय-

'मर्यादित'ची अर्पणपत्रिका

Thursday, November 25, 2010

शहाण्यांबद्दल भालचंद्र नेमाडे

'ललित' मासिकाच्या पहिल्या म्हणजे जानेवारी १९६४च्या अंकात 'स्वागत' या सदरामध्ये भालचंद्र नेमाड्यांचा मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्यातला हा भाग-

'कोसला'बद्दल : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.
***

दुस-या एका ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या दुस-या एका लेखात नेमाडे म्हणतात-

मराठी साहित्याच्या हीनपणाची दखल न्यायमूर्ती रानड्यांपासून अशोक शहाण्यांपर्यंत दर दहावीस वर्षांनी कोणीतरी घेत आलेच आहे.
***

Sunday, November 21, 2010

शहाण्यांबद्दल राजा ढाले

('नवाक्षर दर्शन' ह्या सावंतवाडीहून प्रकाशित होणा-या त्रैमासिकाच्या 'लघुनियतकालिक विशेषांका'तील ढाल्यांच्या लेखातील हा काही भाग. मूळ लेखात ढाल्यांनी शहाण्यांशी लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीविषयी असलेले काही मतभेद त्यांच्या भाषेत मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे मांडले आहेत.)

शहाण्यांचं हे स्केच ढाल्यांनीच काढलंय.
मूळ हे 'ललित' मासिकाच्या
१९६८च्या दिवाळी अंकात आलं होतं
. . . असं असलं तरी अशोक शहाणे हे अखेर माझे एक गुरू आहेत. आयुष्याच्या एका अत्यंत नाजूक वळणावर, एका महत्त्वाच्या पडावावर, एका महत्त्वाच्या टप्प्यावर भेटलेला आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन करणारा एक अप्रतिम गुरू. तो माझ्या विशीतच मला भेटला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वानं मी थरारून आणि झपाटून गेलो. तो मला प्रथम भेटला तेव्हाही त्याच्या ऐन पंचविशीत तो मला म्हातारा वाटला आणि आजही वाटतो. अगदी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध! त्याला मी सतत एक गुरू म्हणून मान देत आलो आणि आमच्या पन्नास वर्षांच्या नात्यात कधी अंतराय निर्माण झाला नाही. उलट, त्याच्यामुळेच आमचा (म्हणजे माझा!) लिट्‍ल मॅगझिन्सच्या क्षितिजावर उदय झाला. अशा वेळी त्यानं आम्हाला काय शिकवलं हे महत्त्वाचं नाही. आम्ही त्याच्यापासून काय शिकलो हे महत्त्वाचं आहे. आणि हे त्यानं आम्हाला मुद्दाम म्हणून शिकवलं नाही. तर आम्ही अनुकरणातून आत्मसात केलं. उदाहरणार्थ, लेखनातून केलं जाणारं तीक्ष्ण शरसंधान अथवा प्रिंटिंगचं तंत्रज्ञान. हे म्हणजे एकलव्याच्या दृष्टांतासारखंच झालं. गुरूच्या नकळत त्याची कला हस्तगत करण्याचं काम! अशा वेळी त्याच्या अभयारण्यात त्यानं पाळलेलं परंपरेचं श्वान आमचा वास काढत आमच्या मागावर आलं, तेव्हा आमच्यावर सतत डूक धरून भुंकणार्‍या त्या परंपरागततेवर आम्ही अचूक शरसंधान करावयास चुकलो नाही. परंतु त्या परंपरेचं शरसंधानाने भरलेलं गच्च थोबाड पाहूनही त्यानं आम्हाला त्याबद्दल जाब विचारला नाही; अथवा आंगठाही कापून मागितला नाही. त्या दृष्टीनं हा द्रोणाचार्य थोरच!

Wednesday, November 17, 2010

शहाण्यांबद्दल चंद्रकान्त पाटील

अनेक बंगाली लेखकांची नावं आम्हाला माहीत झाली ती अशोक शहाणेमुळे. १९६० ते ६५ हा माझा साहित्यातला अगदी सुरुवातीचा काळ. याच काळात प्रतिष्ठानआणि सत्यकथेमध्ये मी जास्तीत जास्त कविता लिहिल्या, कवितेनं विलक्षण झपाटून गेलो, मराठी कवितेची असंख्य पारायणं केली, चांगलं-वाईट मनात नोंदवून घेतलं, आणि जसजसं कवितेबाबतचं असमाधान वाढत गेलं, मराठीबाहेरची कविता शोधीत-वाचीत गेलो. त्यात इंग्रजीतनं आलेली परदेशी कविता होती, उर्दू-हिंदी कविता होती, आणि निव्वळ अशोक शहाणेमुळे माहीत झालेली बंगाली कविता होती. १९६१च्या अखेर निघालेलं अथर्व’, मग १९६३च्या आसपास निघालेले काकतकरांच्या रहस्यरंजनचे अंक, १९६५च्या जवळपास घोषणा झालेलं पण कधीच न निघालेलं हस्तकहे फक्त कवितांचं नियतकालिक, पुन्हा घोषित होऊन कधीच न निघालेलं कथाली’, आणि त्या आधी दुसर्‍या पर्वात सुरू करून ओळीनं निघालेले अभिरुचीचे ९ अंक एवढं अशोक शहाणे यांचं वाङ्मयीन कार्य आत्ताच्या पिढीला माहीत आहे की नाही, शंकाच आहे. पण माझ्यासारख्या कवितेवर प्रेम करून निष्ठापूर्वक जगणार्‍या त्या काळच्या तरुणांना अशोक शहाणे यांनी बरंच काही दिलं होतं. निखळ यादीच द्यायची तर अथर्व’, ‘असोमधून अशोकनं शक्ती चट्टोपाध्यायबरोबरच ज्यांचं साहित्य मराठीत आणलं ते कवी-लेखक जीवनानंद दास- उत्पलकुमार बसू- तारापद राय- शैलेश्वर घोष- सुरंजन चटोपाध्याय- प्रदीप चौधरी- वासुदेव दासगुप्त- सुभाष घोष इत्यादी. ही सगळी नावं १९६२ ते १९६५ च्या काळात हंग्री जनरेशनम्हणून गाजलेल्या विद्रोही वाङ्मयीन चळवळीशी संबंधित होती. अशोकनं अशी अमेरिकेतली बीट जनरेशन’, बंगालची हंग्री जनरेशनम्हणजे भूखी पिढी, आणि मराठीतली संतप्त लेखकांची पहिली पिढी यांची नीट संगत लावून मराठी लोकांसमोर आणली. बीट जनरेशनचा अ‍ॅलन गिन्सबर्ग शक्तीदाचा मित्र, शक्तीदा अशोकचे मित्र, असा हा प्रकार होता.
***

चंद्रकान्त पाटील
चंद्रकान्त पाटीलांनी लिहिलेल्या शक्तीदाबद्दलया लेखातील मजकूर.

Tuesday, November 16, 2010

Monday, November 15, 2010

एक फोटो

पिकासोला हातात घेऊन बसलेल्या शहाण्यांचा फोटो. 
त्यांचा फोटो काढायचा प्रयत्न करताना दिसतायत ते अतुल दोडिया. 
नि हा फोटो  रेखा शहाणे यांनी काढला.

अजून एक फोटो

वृंदावन दंडवतेंनी काढलेला शहाण्यांचा फोटो.

Saturday, November 13, 2010

अशोक शहाण्यांची पंच्याहत्तरी

- नामदेव ढसाळ

('सर्वकाही समष्टीसाठी' या सदरात १३ फेब्रुवारी २०१० ला प्रसिद्ध झालेला मजकूर)

'खरं बोललं की सख्ख्या आईलाही राग येतो' अशी मराठीत म्हण आहे. आमचे ज्येष्ठ मित्र अशोक शहाणे खरे बोलण्यात वस्तादच आहेत. खरं म्हणजे सत्य. जस्सं आहे तस्सं. या असल्या 'खरं' बोलण्यातच चिक्कार शत्रू आपण निर्माण करतो हे खरं बोलणा-याच्या गावीही नसतं. अशोकने आज पंच्याहत्तरी गाठली. खरं बोलण्याचे त्याने डोंगरच डोंगर उभे केले. मग तुम्ही म्हणाल, च्यायला! या अशोक शहाण्यानं जणू उभं जगच आपलं शत्रू करून सोडलंय. यात गंमत अशी आहे पाहा- एवढे करून नावालाही कुणी अशोकचा आजवर शत्रू झाला नाही. आचरट, आतरंगी मूल जसं आई-बापांना छानपैकी आवडत असतं. अशोक ज्या लोकांच्या संपर्कात किंवा जे लोक अशोकच्या परिघात सापडतात त्यांची अवस्था आतरंगी मुलाच्या आई-बापासारखीच होते. सत्यान्वेषी सत्यप्रिय माणसं सहन करण्याची ही ताकद हळूहळू प्रत्येकात येतच असते. एरवी सत्य म्हणजे सापेक्षच गोष्ट. ज्याला आपण सत्य म्हणून संबोधलेलं असतं. ते असत्यही असू शकते. भाषासंज्ञेचा छान वापर करून उत्क्रांतपणाच्या वाढीत माणसाने सत्याची व्याख्या केली असेल. प्रमाण आणि कसोट्यांवरून सत्याची केलेली व्याख्या आपण धरून चालतो की याबाबत अमुकअमुक यास सत्य म्हणतात. पण त्या सत्याच्या व्याख्येलाच असत्याची व्याख्या माणसाने पहिल्यापासून म्हटले असते तर त्या सत्याला आपण असत्य म्हटले असतेच की. ही अशी शब्दार्थाची, त्याच्या व्याख्येची छान फिरवाफिरवी ज्याला करता येते- अशा फिरवाफिरवीत जो निष्णात असतो तो प्रत्येक जण मला अशोक शहाणेच वाटत राहतो. धडक, तिरकस चिमटे काढत बोलणारा प्रत्येक जण अशोक शहाणेच वाटत राहतो. असो.

अशोकच्या सत्यान्वेषी अभिवृत्तीपेक्षा मला आवडतो तो त्याचा मनुष्यवेल्हाळ स्वभाव. त्याच्या बोलण्या-चालण्यातून मोकळं-ढाकळं वागण्यातून त्याच्या संपर्कात येणारा माणूस त्याच्याशी कायमचा जोडला जातो. त्यात कवी, लेखक, कलावंत, माणसंच असतात असं नाही तर सर्वसामान्य माणूस त्याच्यासाठी अजीज असतो. एक विशेष गोष्ट तुमच्या ध्यानात आणून द्यायला हरकत नाही. कला, साहित्य क्षेत्रातलं मक्तेदारीचं अभिजनत्व नाकारून त्यातल्या सहज सरळ सोपेपणाला सर्जनशील अभिव्यक्तीची उपजत जाण असलेला अशोक अक्षरवाङ्मयात काम करणा-यांना प्रिय असतो. तसाच यासाठी अनभिज्ञ असणा-यांना तो या सर्वांची गोडी लावून जातो. ही ग्रेट गोष्ट अशोकचे वाङ्मयीन शिष्यत्व पत्करणा-या महाभागांनाही जमत नाही. कारण त्यांची ज्ञानोपासना एकार्थी मर्यादितच असते किंवा एककल्ली असते. ज्ञानोपासनेच्या अर्थाने अशोक बाप माणूसच म्हटला पाहिजे. माझ्या बायकोने यापूर्वी दिलीप चित्रेला चालत्याबोलत्या विश्वकोशाची उपमा दिली होती. अशोकला अशा उपमेत डकवून मी त्याचा जगड्व्याळपणा छोटा करू इच्छित नाही. अशोक ज्ञानसंपन्न माणूस आहे, पण प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या अवडंबराने त्यातले माणूसपण मोडून गेलेले नाही. ते अधिक मनुष्यकेंद्री आणि अधिक मानवीय झालेले आहे. म्हणून त्याला ज्ञानाचा दंभ जडलेला नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी त्याची वृत्ती नाही. ज्ञानी मनुष्य उभे जग जोडतो. चराचर जोडतो. अशोकचे वाङ्मयीन शिष्यत्व पत्करणारी माणसे मात्र अशोकचा हा वारसा पेलू शकलेली नाहीत. ज्ञानाच्या दंभात ती एवढी अमानुष झालेली असतात की, अखेरी ती पाहता पाहता मनुष्यद्वेष्टी होऊन जातात. अशोकबरोबरच्या वाङ्मयीन असो अथवा गैरवाङ्मयीन चर्चा मनाला आल्हाद देऊन जातात. ज्ञानजिज्ञासेच्या अर्थाने सुखावून जातात. अशोक स्वतःकडे, मित्रांकडे, जगाकडे, जगरहाटीकडे भाष्यकारांच्या नजरेतून बघत नाही. जगण्यावर अतोनात प्रेम असलेल्या आस्थेतून तो पाहतो. आज अशोक पंच्याहत्तर वर्षांचा झाला म्हणून त्याच्या आप्तजन, मित्रांनी जागरण घातले. खरे तर चौसष्ट-पासष्टपासून मी अशोकला पाहत आलो. पहिल्यांदा जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा तो मला वय वर्षे शंभराचा वाटत आला. माझ्या बायकोने तर त्यावर छान कोटी केली. ती म्हणाली, काय म्हणावं, अशोकच्या मित्रांना अशोक पंच्याहत्तर वर्षांचा झाला म्हणतात म्हंजे या लोकांनी शंभराकडून उलटी गिनती सुरू केली की काय! इतुका न मी म्हातारा, वय पाऊणशे नव्हे शंभर वर्षे जणू!

अनियतकालिकांच्या चळवळीचे अशोकला पायोनियर म्हटले जाते. एस्टॅब्लिशमेंटविरुद्ध त्याने वाङ्मयीन चळवळ उभी केल्याचे म्हटले जाते. याविषयी अशोकची मोकळी-ढाकळी मते. चंद्रकांत खोतप्रणित लघुनियतकालिकांच्या पहिल्या पर्वातील पाचव्या अंकात खोताने तयार केलेल्या प्रश्नावलीच्या अनुरोधाने अशोकची घेतलेली मुलाखत जिज्ञासूंसाठी डोळ्यातील अंजन ठरावे. नाना काकतकरांमुळे अशोक अनियतकालिकांच्या उपद्व्यापात सापडला. याचे मनोरंजक अशोकच्याच शब्दातले वर्णन लघुनियतकालिकांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. बांधिलकी, बंडखोरी, संतप्त पिढी वगैरे शब्दप्रयोग अनियतकालिकांच्या चळवळीला लावले गेले त्यात काही राम नव्हता असे अशोकचे म्हणणे. त्याचे म्हणणे एवढेच की, त्या दरम्यान जे साहित्यिक मूल्याविषयी, अभिव्यक्तीविषयी अवडंबर माजवले जात होते ते तोडून साहित्य सर्जन व्यवहारात मोकळे-ढाकळेपणा आणणे एवढेच उद्दीष्ट माझ्यासमोर होते, असे अशोकने 'अबकडइ'च्या प्रश्नोत्तरात म्हटले आहे.

अनियतकालिकांच्या चळवळीत अशोक ओढला गेला नाना काकतकरांमुळे. गांधी वधानंतर काकतकरांना आपले गावशीव सोडून मुंबईत यावे लागले होते. बाबुराव अर्नाळकरांची रहस्यमय कादंबरी विभागशः मासिकात छापून ज्या मासिकाचे नाव 'रहस्यरंजन' होते ते चालवले जात होते उदरनिर्वाहासाठी. याशिवाय खानावळीचा काकतकरांचा धंदा होता. या 'रहस्यरंजन' मासिकाचे संपादन काही कारणे सदानंद रेगे करीत असे. रवींद्रनाथ टागोरांवर अंक काढण्यासाठी सदूने 'रहस्यरंजन'च्या कंपूत अशोकला घेतले आणि अशोक अनायासे अनियतकालिकांच्या चळवळीशी जोडला गेला. अशोकचे बंगाली भाषेवरले, वाङ्मयावरले प्रेम असे कामी आले.

'रहस्यरंजन'नंतर 'अथर्व' या नियतकालिकाचा एकच अंक त्यानंतर तीन-चार वर्षांनी 'असो' या लघुनियतकालिकाची सुरुवात झाली. १४ अंक निघाले. हा लघुनियतकालिकांचा सव्यापसवव्य व्यापार अशोकला लिट्ल मॅगझिनचा पायोनियर बनवून गेला. खरे तर 'रहस्यरंजन' असो अथवा 'अथर्व' या अगोदर दिलीप चित्रे, रमेश समर्थ, मन्या ओक, भाऊ पाध्ये आदींना घेऊन अशोकने 'शब्द'चा अंक काढलाच  होता. नुसत्या 'शब्द'चा संदर्भही अशोकला या चळवळीचा पायोनियर बनविण्यास पुरेसा आहे. काहीही असो. या चळवळीला सैद्धांतिक भूमिका नव्हती. या मल्लिनाथीत आपल्याला रस नाही, परंतु या चळवळीमुळेच मराठी वाङ्मयातील अभिजनवृत्ती ही पराभूत झाली. याचे सर्व श्रेय या चळवळीला जाते. अशोकने या चळवळीच्या भाष्यकाराची भूमिका जरी वेळोवेळी नाकारली असली तरी मराठी साहित्यातील कोंडी या लघुनियतकालिकांमुळे फुटली. पुरोगामी साहित्य चळवळ असो अथवा दलित साहित्याची चळवळ अथवा विद्रोही साहित्याची चळवळ, लघुनियतकालिकांमुळे जोर धरू शकली.

मैत्र